top of page

श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड आणि भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

Vedant Manthan Sajjangad 2026 B.png

वैशाख शु. तृतीया (अक्षय्यतृतीया) ते वैशाख शु. पंचमी (आद्य शंकराचार्य जयंती)
​१९ एप्रिल ते २१ एप्रिल २०२६
​ठिकाण : श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड

निःशुल्क शिबीर...!!! आजच नोंदणी करा...!!!

भारतीय तत्त्वज्ञानपरंपरेत वेदान्त हे अध्यात्मविद्या आणि मोक्षविचार परंपरांमधील सर्वोच्च दर्शन मानले गेले आहे. उपनिषदांमध्ये प्रतिपादित झालेली ही ब्रह्मविद्या आद्य शंकराचार्य यांनी अद्वैत-वेदान्ताच्या सुसूत्र व तर्कसुसंगत मांडणीतून लोकाभिमुख केली. त्यांच्या जयंतीनिमित्त अध्यात्मचिंतन, शास्त्रसमन्वय आणि अभ्यासक-प्रबोधन या उद्देशाने तीन दिवसीय निवासी ‘वेदान्त मंथन शिबिर’ आयोजित करण्यात येत आहे. हे शिबिर समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने सज्जनगड येथे होणार असून, पुण्यातील भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज् ही संस्था देखील यांत सहभागी होते आहे. सज्जनगड हे श्रीसमर्थांच्या साधना-परंपरेची साक्ष देणारे  पावन क्षेत्र असल्याने येथे होणारे वेदान्त-चिंतन हे साधकांना निश्चितच प्रचीती व प्रेरणा प्रदान करणारे ठरेल.

शिबिराची प्रमुख उद्दिष्टे

  1.  वेदान्त परंपरेतील आद्य प्रस्थान असलेल्या उपनिषदांचे तात्त्विक आणि आध्यात्मिक स्वरूप अभ्यासकांपर्यंत पोहोचवणे.

  2.  स्वतंत्र सत्रांमधून दहा महत्त्वाच्या उपनिषदांची तोंडओळख करून देणे.

  3.  अद्वैत-वेदान्ताची मूलतत्त्वे, महावाक्ये, आत्मा–ब्रह्म तत्त्व यांचे सूक्ष्म विवेचन.

  4.  शास्त्र-अध्ययनासाठी आवश्यक दृष्टी, अभ्यासपद्धती आणि चिंतन-मार्ग यांचे मार्गदर्शन.

  5.  शास्त्रसंवाद, प्रश्नोत्तर आणि चिंतन-सत्रांतून अध्ययन अधिक सजीव करणे.


अभ्यासरचना

  1.  शिबिरामध्ये प्रत्येक सत्रात एका उपनिषदाचा परिचय, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मुख्य मंत्र, तत्त्वचर्चा आणि उपयोजनीयतेचा विचार केला जाईल. 

  2.  अभ्यासकांना पुढील अध्ययनासाठी मार्गदर्शक दृष्टी व संदर्भसूची उपलब्ध करून दिली जाईल.

  3.  सत्रांमध्ये प्रामुख्याने ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, माण्डूक्य, तैत्तिरीय, ऐतरेय, छांदोग्य व बृहदारण्यक उपनिषदांचा परिचय अपेक्षित आहे.


अपेक्षित फलश्रुती

  • वेदान्त-वाङ्मयाविषयी मूलभूत बौद्धिक स्पष्टता.

  • अद्वैत तत्त्वज्ञानाची संकल्पनात्मक समज.

  • उपनिषदांतील प्रमुख संज्ञा व विचारपरंपरेची ओळख.

  • अभ्यासक, संशोधक व जिज्ञासू यांच्यात शास्त्रसंवादाचे सशक्त व्यासपीठ.


हे शिबिर अध्यात्म वा साधना क्षेत्रातील पांथस्थांसाठी पाथेय व्हावे एवढीच खरंतर अपेक्षा आहे.  सज्जनगडावरील पावन वातावरणांत, आद्य श्रीशंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने वेदान्त-विचारांचा जागर व्हावा, भारतीय दार्शनिक परंपरेमधील आचार्य व संतांच्या हृद्गतातील वाङ्मयातील एकात्मता अधिकाधिक स्पष्ट व्हावी यासाठीच हा उपक्रम आयोजित केला जात आहे.

निवास व भोजन व्यवस्था

  1. शिबिर पूर्णपणे निवासी स्वरूपाचे असून राहण्याची व भोजनाची व्यवस्था समर्थ सेवा मंडळामार्फत केली जाणार आहे.

  2. अध्यात्म विचारासाठी चिंतन सत्र, तज्ज्ञ अनुभवी मार्गदर्शक आणि सज्जनगडासारख्या पवित्र क्षेत्राचा सहवास यांचा सुंदर संगम या उपक्रमात साधला जाईल.

निःशुल्क शिबीर...!!! आजच नोंदणी करा...!!!

bottom of page